उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचे का टाळले ?
मुंबई :- महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा पाठिंबा तसेच पुरेशी मते असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक लढविण्याचे टाळून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांना संधी दिली आहे. दानवे यांच्यासारखा मोहरा पक्ष सोडून जाऊ नये या उद्देशानेच ठाकरे यांनी विधिमंडळापासून दूर राहण्यावर भर दिला असल्याचे बोलले जाते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीही अंमलात आणला होता. ठाकरे घराण्यात आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात उतरलेला पहिलेच होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचा घोळ सुरू असताना महाविकास आघाडी आकारास येऊन त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ठाकरे हे कोणत्याची सभागृहाचे सदस्य नव्हते. सहा महिन्यांच्या मुदतीत ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जून २०२२ मध्ये ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना ठाकरे यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. पण मुदत पूर्ण होईपर्यंत ठाकरे यांनी आमदारकी कायम राखली होती. 'आमदारकीच्या राजीनाम्याचे मी जाहीर केले होते. पण मी राजीनामा दिल्यावर त्या जागी महायुतीचा उमेदवार निवडून आला असता. म्हणून राजीनामा दिला नव्हता,असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे हे रिंगणात उतरले असते तर शिवसेना शिंदे गटाकडून कदाचित एखादा अतिरिक्त उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशा परिस्थितीत ठाकरे यांना निवडून येण्यासाठी मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागले असते. २०२९ पर्यंत कोणतेही पद मिळण्याची शक्यता नाही. यामुळेच ठाकरे यांनी निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली असावी. विधान परिषदेत ठाकरे हे फारसे सक्रिय नसत. ते अपवादानेच सभागृहात येत असत. तसेच शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर आरोप करण्याची संधी ठाकरे यांना गमावली होती.
दानवे यांना संधी
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अनेक बिनीच्या नेत्यांनी ठाकरे यांची साथ सोडली होती. अंबादास दावने हे ठाकरे यांच्याबरोबर राहिले. दानवे यांनी बरोबर यावे म्हणून एकनाथ शिंदे यांनी बरेच प्रयत्न केले होते. अगदी विधान परिषदेची आमदारकी देण्याची तयारी दर्शविली होती. दानवे यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे. दावने यांना आता डावलले असते तर ते ठाकरे गटात थांबणे कठीण होते. त्यांना आमदारकी देऊन उद्धव ठाकरे यांनी एका विश्वासू सहकाऱ्याचा सन्मान केला आहे.