कोंढापुरी येथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
शिरूर (प्रतिनिधी:- विजय ढमढेरे):- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. कोंढापुरी येथील पाझर तलाव पावणेचार दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा असून या पाझर तलावात महिनाभरापासून पाणी नाही. तलावातील पाणीसाठा महिनाभरापूर्वीच संपल्याने पाझर तलावातील पाण्यावर अवलंबून असलेली शेतातील पिके करपून जाण्याची शक्यता शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ब-याचशा शेतक-यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याचीही भीती शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे. कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाण्यावर कोंढापुरी,गणेगाव खालसा,खंडाळे,कवठीमळा,कासारी शिवारातील शेतकरी अवलंबून आहेत. तसेच या पाझर तलावातून शिक्रापूर,श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबविलेली आहे. सध्या या पाझर तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने कोट्यवधी रूपयांची पाणीयोजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी आले होते त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचूंदकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून कोंढापुरी पाझर तलावात पाणी नसल्याच्या गंभीर समस्येबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे विश्वसनीय रित्या समजते. दरम्यान बारामती,मंचर, उरूळी कांचन परिसरात पाऊस झाल्याचे समजते. कोंढापुरी येथील पाझर तलावात ब-याच दिवसांपासून पाणी नाही तसेच पाऊसही नाही. पाऊस झाल्यावर किमान पिकांना तरी जीवदान मिळेल या आशेने शेतक-यांचे लक्ष पावसाकडे तसेच कोंढापुरी पाझर तलावात पाणी कधी येईल याकडे लागलेले आहे.