कोंढापुरी तलावातील पाणीसाठ्यात वाढ नाही
शिरूर ( प्रतिनिधी विजय ढमढेरे):- परिसरात मुसळधार पाऊस होवूनही शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी परिसरात गेल्या ४ -५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शिक्रापूर,तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीला पूर आला.वेळ नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अचानक बर्फासारखा पांढरा शुभ्र फेस तरंगताना दिसल्याने तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली.वेळ नदीतील पाण्याचा वापर तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थ घरगुती कामासाठी,जनावरांसाठी तसेच शेतीसाठी करतात.सुमारे १५ फूट उंचीपर्यंत आलेल्या पाण्यातील फेसामुळे वेळ नदीतील पाणी प्रदूषित झाल्याची भीती तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कोरेगाव भीमा, पेरणे,पिंपरी सांडस,डिंग्रजवाडी,धानोरे,न्हावी सांडस,सांगवी सांडस,विठ्ठलवाडी परिसरातून वाहणा-या भीमा नदीला आलेल्या पुरामुळे विठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने शिरूर,हवेली,दौंड या तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान,खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणात ८८.५२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे असे समजते.पानशेत धरणात ४२.८७ टक्के,वरसगाव धरणात ३९.२५ टक्के,टेमघर धरणात २३.३१ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आल्याचे समजते. कोंढापुरी येथील पाझर तलावातून श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती,शिक्रापूर गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविलेली असून तलावात अद्याप पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याने आडसाली ऊस लागवडी खोळंबल्या असून पाझर तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतक-यांनी चिंता व्यक्त केली आहे.