रेटवडी ओढ्याच्या पुलावरून दुचाकीवरील तरूण बेपत्ता
शिरूर (प्रतिनिधी):- ओढ्याच्या पुलावरून दुचाकीवरून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील रेटवडी ओढ्याच्या पुलावर घडली. समीर भीमाजी जाधव वय -३० वर्षे असे ओढ्यावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या युवकाचे नाव असून समीर जाधव हा युवक मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस,ग्रामस्थ तसेच स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. संततधार पावसामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याचे समजते. स्थानिक पत्रकारांशी बोलताना या घटनेबाबत पंचायत समिती सदस्य दिलीप दुबे यांनी सांगितले,या ओढ्यावरील पुलाची उंची अतिशय कमी असून यापूर्वीही याच ठिकाणी एक तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. पुलावरून पाणी वाहात असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत या पुलावरून प्रवास करू नये असे आवाहन पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे यांनी केले आहे.