कल्याण -आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान "फटका" गँग पुन्हा सक्रिय
धावत्या एक्सप्रेसमधील प्रवाशाच्या हातावर काठीने फटका मारून 30 हजारांचा मोबाईल केला लंपास
कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू
कल्याण :- धावत्या मेल एक्सप्रेस लोकल मध्ये असलेल्या प्रवासाच्या हातावर फटका मारून प्रवाशाचे मोबाईलसह किंमती ऐवज लंपास करणारे फटका गॅंग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस लोकल स्लो होताच रुळावर उभे असलेल्या काही तरुण प्रवाशांच्या हाताला फटका मारत खाली पडलेला मोबाईल चोरून पळ काढतायत. अशीच घटना समोर आली. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ संत गतीने धावणाऱ्या बल्लारशहा-लोकमान्य टिळक एक्सप्रेसमधील एका प्रवाशाच्या हातावर चोरट्याने काठीने जोरदार फटका मारत त्याचा
30हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. कल्याणच्या बैलबाजार परिसरात राहणारे सोहेल मेहबुब शेख हे अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथून बल्लारशहा लोकमान्य टिळक एक्सप्रेसने कल्याणकडे परत येत होते. कल्याण स्थानक जवळ आल्याने ते टिटवाळा स्थानकापासून रेल्वेच्या दारात उभे राहून कुटुंबीयाशी मोबाईलवर बोलत होते. दरम्यान,आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचा वेग मंदावताच रेल्वे मार्गालगत दबा धरून बसलेल्या एका चोरट्याने संधी साधली. दारात उभ्या असलेल्या सोहेल यांच्या हातावर लाकडी काठीने जोरदार फटका मारला. या फटक्यामुळे त्यांच्या हातातील मोबाईल रेल्वे रुळांवर पडला.काय घडले हे समजण्यापूर्वीच चोरट्याने रुळावर पडलेला मोबाईल उचलला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.