पारदर्शक शिक्षक भरतीमुळे आदिवासी वस्ती,उर्दू वरील शाळांना बळ
जिल्हा परिषद प्रशासनाचे काम कौतुकास्पद:राजेश सावरकर
अमरावती:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांची पदस्थापना प्रक्रिया अत्यंत पारदर्शक,नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने पार पडली. समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होताच कुठलाही विलंब न लावता १०सप्टेंबरला सर्व शिक्षकांच्या हाती नियुक्ती आदेश सोपवले. तर शिक्षक उद्या सकाळी पहिल्या सत्रात हजर होणार आहेत. या तत्पर आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे शिक्षण क्षेत्रावरील समाजाचा विश्वास अधिक दृढ झाला असून,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी शासन,शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन केले. अमरावती जिल्हा परिषदेत रिक्त जागांवर शिक्षकांची यशस्वी पदस्थापना करण्यात आली आहे.यामध्ये मेळघाट पेसा क्षेत्रातील वर्ग १ ते ५ करिता ५४ पैकी ५३,वर्ग ६ ते ८ गणित-विज्ञानासाठी ७७ पैकी ७७ आणि भाषा विषयासाठी ३० पैकी ३० उमेदवार उपस्थित होते. तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील उर्दू माध्यम वर्ग १ ते ५ मधील १९ व वर्ग ६ ते ८ मधील विविध विषयांचे ११ असे सर्व उमेदवार उपस्थित होते. विशेष म्हणजे,मेळघाट पेसा क्षेत्रातील वर्ग १ ते ५ मधील शेवटच्या उमेदवारालाही मेळघाट क्षेत्रातच समुपदेशनाद्वारे पदस्थापना मिळाली,त्यामुळे प्रक्रियेतील पारदर्शकता व नियमानुसार संधीचे प्रभावी दर्शन घडले. प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दीर्घकाळापासून जाणवत होती. अनेक शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र झालेल्या १९०शिक्षकांच्या पदस्थापनेमुळे दुर्गम भागातील शाळांची शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षकांचे मनोबल उंचावले
शिक्षक नेते राजेश सावरकर म्हणाले शिक्षणासारख्या पवित्र आणि संस्कारक्षम क्षेत्राबद्दल समाजाचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल,तर नोकरी,बदली आणि पदोन्नती या सर्व प्रक्रिया १०० टक्के पारदर्शक असाव्या असे मत शिक्षक समितीचे आहे.
प्रशासकीय नेतृत्वाचे मानले आभार
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला गती दिल्याबद्दल तौंदकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग तसेच शालेय शिक्षण मंत्री यांचे जाहीर आभार मानले. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये ही समुपदेशन व पदस्थापना प्रक्रिया अत्यंत काटेकोर व जलद गतीने राबवल्याबद्दल अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)सत्यम गांधी,प्राथमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. आणि गुणवत्तेवर आधारित असायला हव्यात. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि गुणवत्तेचा आदर राखत ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे कोणत्याही वशिलेबाजीला थारा न मिळता गुणवंत उमेदवारांना न्याय मिळाला असून,नवनियुक्त शिक्षकांचे मनोबल यामुळे प्रचंड उंचावले आहे. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे,उपशिक्षणाधिकारी सतीश मुगल,अधीक्षक वर्ग-२ नरेंद्र गायकवाड उपस्थित होते. पवित्र पोर्टल पदभरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने,विजय कविटकर,वरिष्ठ सहाय्यक विजय राऊत,राहुल काळमेघ,विजय मालोकार, निलेश दहातोंडे,विलास मेंदुकर,सुदर्शन भोसले,कनिष्ठ सहाय्यक विशाल कुळसंगे,अनिकेत हुरडे,संगणक परिचालक अतुल देशमुख, श्याम देशमुख,युसुफ शहा,गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.