कृत्रिम तलावांचा पालिकेला हट्ट;जनतेच्या पैशांची उधळपट्टी !
कायमस्वरूपी विसर्जन घाटासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव;दरवर्षीच्या खर्चाला विरोध
ठाणे :- मीवर ठाणे महापालिकेने यंदाही विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांचे खोदकाम सुरू केले आहे. मात्र,ठाणेकर भाविकांचा वाहत्या पाण्यात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याकडे अधिक कल असताना,दरवर्षी तात्पुरते तलाव खोदून त्यावर मोठा सार्वजनिक निधी खर्च करण्याचा पालिकेचा अट्टहास कशासाठी,असा सवाल उपस्थित होत आहे. तलावपाळी येथे उभारण्यात आलेल्या ‘दत्त घाटा’च्या धर्तीवर ठाणे खाडी तसेच शहरातील प्रमुख तलावांच्या ठिकाणी कायमस्वरूपी विसर्जन घाट उभारावेत,अशी पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी यापूर्वी सूचना केली होती. अशा व्यवस्थेमुळे भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखतानाच नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषणही कमी करता येऊ शकते. मात्र या सूचनेकडे ठाणे महापालिका प्रशासनाने फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी पुन्हा खोदकाम, पुन्हा खर्च आणि पुन्हा त्याच समस्यांचा सामना,अशी पालिकेची कार्यपद्धती सुरूच आहे. तात्पुरत्या तलावांमध्ये विसर्जनानंतर पाणी साचून राहणे,डासांची उत्पत्ती,निर्माल्य व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे प्रश्नही निर्माण होतात. एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली विविध उपक्रम राबवले जात असताना,गणेश विसर्जनासाठी मात्र कायमस्वरूपी पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याकडे दुर्लक्ष का,असा सवाल आता ठाणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. तात्पुरत्या तलावांवर दरवर्षी होणारा खर्च करण्यापेक्षा एकदाच नियोजनबद्ध कायमस्वरूपी ‘दत्त घाट’ उभारला तर जनतेचा पैसा वाचेल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल. त्यामुळे यंदाचे कृत्रिम तलावांचे खोदकाम करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजनेचा विचार करावा,अशी मागणी जोर धरत आहे. तात्पुरते तलाव खोदून दरवर्षी खर्च करण्याऐवजी कायमस्वरूपी पर्यावरणपूरक विसर्जन घाट उभारणे गरजेचे आहे. पालिकेने सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रश्नात तातडीने हस्तक्षेपाची मागणी करणार आहे.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक,ठाणे)